२७ फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन असतो. त्या निमित्ताने आजपासून प्रसिद्ध करत आहोत मराठीचं कौतुक करणाऱ्या काही कविता. या उपक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या रचनेपासून..............
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।।
ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ।।१।।
जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादींचे रंग थोडे ।
वेधें परिमळाचें बीक मोडे। जयाचेनि।।२।।
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होती जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंभा। एकमेकां।।३।।
सहजें शब्दु तरी विषो श्रवणाचा । परि रसना म्हणेरसु हा आमुचा ।
घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ।।४।।
नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां डोळयांही पुरों लागे धणी ।
ते म्हणती उघडली खाणी । रुपाची हे ।।५।।
जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धांवे बाहिरें ।
बोलुं भुजांहीं आविष्करे । आलिंगावया ।।६।।
ऐशीं इंद्रियें आपुलालिया भावीं । झोंबती परि तो सरिसेपणेंचि
बुझावी । जैसा एकला जग चेववी । सहस्रकरु ।।७।।
तैसें शब्दाचें व्यापकपण । देखिजे असाधारण ।
पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ।।८।।
हें असो तया बोलांची ताटें भलीं । वरी कैवल्यरसें वोगरिलीं ।
ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ।।९।।